महाराष्‍ट्र शासनाने सन १९४० साली भाडे नियंत्रण कायदयानुसार गाळयांची भाडी सन १९४० च्‍या पातळीवर नियंत्रित केल्‍यामुळे मुंबई शहर बेटावरील भाडेतत्‍वावरील जुन्‍या मोडकळीस आलेल्‍या इमारतींच्‍या दुरुस्‍ती व पुनर्रचनेचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी सन १९६८ साली बेडेकर समितीची स्‍थापना केली. सदर समितीने केलेल्‍या शिफारशीनुसार शासनाने मुंबई इमारत घरदुरुस्‍ती व पुनर्रचना कायदा १९६९ मंजूर केला व या कायदयांतर्गत मुंबई इमारत दुरुस्‍ती व पुनर्रचना मंडळाची स्‍थापना सन १९७१ साली करण्‍यांत आली.

या कायदयाच्‍या तरतुदीनुसार जुन्‍या मोडकळीस आलेल्‍या भाडेतत्‍वावरील इमारतींना दुरुस्‍ती उपकर लागू करण्‍यांत आला व अशा इमारतींना 'उपकरप्राप्‍त इमारती ' म्‍हणून संबोधण्‍यांत येते. सन १९७७ पर्यंत सदर मंडळ महाराष्‍ट्र शासनाच्‍या अधिपत्‍याखाली कार्यरत होते. तदनंतर डिसेंबर १९७७ मध्‍ये सदर कायदयाचा अंतर्भाव महाराष्‍ट्र गहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ मध्‍ये करण्‍यांत आला.तदनंतर मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळळाचे नोव्‍हेंबर १९९२ मध्‍ये म्‍हाड कायदा कलम १८ च्‍या तरतुदीनुसार तीन विभागात विभाजन होऊन, तीन मंडळांची स्‍थापना झाली.

  • मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
  • मुंबई गलिच्‍छवस्‍ती सुधार मंडळ
  • मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ

म्‍हाड कायदा १९७६ मधील प्रकरण ८ आणि ८-अ मधील तरतुदीनुसार जुन्‍या उपकरप्राप्‍त इमारतींच्‍या दुरुस्‍तीची व पुनर्रचना करण्‍याची जबाबदारी मुंबई इमारत दुरुस्‍ती आणि पुनर्रचना मंडळास देण्‍यांत आली आहे

सन १९६९ मधील आणि मार्च २००९ पर्यतच्या उपकरप्राप्त इमारतींचा तपशील :
अ.क्र. उपकार वर्ग बांधकामाचे वर्ष मूळ उपकरप्राप्त इमारतींची संख्या मार्च २००९ पर्यतच्या उपकरप्राप्त इमारतींची संख्या
१. "अ" दि.१ सप्टेंबर १९४० पूर्वी १६,५०२ १३,३६०
२. "ब" दि.१ सप्टेंबर १९४० ते दि.३१ डिंसेबर १९५० पर्यत १,४८९ १४७४
३. "क" दि. १ जानेवारी १९५१ १,६५१ १२७०
एकूण
१९,६४२ १६१०४